होळी सणासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर आणखी तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गुरूवारी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये पनवेल ते चिपळूण मार्गावर आठ डब्यांची मेमू लोकल गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे केवळ होळीसाठी न सोडता ती कायमस्वरूपी करावी, अशी येथील प्रवाशांची मागणी आहे.
होळी सणानिमित्त कोकण रेल्वेमार्गावर तीन स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात चिपळूण-पनवेल-चिपळूण अशी अनारक्षित मेमू विशेष गाडी असेल. चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू विशेष चिपळूणवरून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून पनवेल येथे रात्री ८ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. ही गाडी १३ ते १६ मार्च या कालावधीत धावेल. परतीच्या प्रवासात पनवेल-चिपळूण मार्गावर ही गाडी पनवेलवरून रात्री ९ वाजून १० मिनिटांनी सुटून चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता पोहचेल. ही गाडी १३ ते १६ मार्च या कालावधीत धावेल. आठ डब्यांची ही गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण हे थांबे घेणार आहे. ही रेल्वे कायम करण्याची मागणी येथील प्रवाशांची आहे.
कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांशी एक्स्प्रेस गाड्या आहेत. त्यांना जनरल डबे फार कमी आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना त्यांच्या हक्काची एक गाडी हवी आहे. रत्नागिरी आणि चिपळूण येथून प्रवाशांची संख्या मोठी असते त्यामुळे मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्यात यावी.अशी मागणी आशिष खातू, जिल्हा उपाध्यक्ष भाजप यांनी केली आहे.